Shreya Maskar
स्थानिक प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, गोपाळगड किल्ल्याच्या मालकीच्या वादानंतर हा किल्ला आता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे.
रत्नागिरी पोलीस दलाने गोपाळगडावर विशेष स्वच्छता मोहीम राबवली. तसेच पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा स्थळाचे जतन-संवर्धन करण्याचा संदेश दिला.
गोपाळगड किल्ला ज्याला अंजनवेल किल्ला म्हणूनही ओळखले जाते. हा महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरजवळ असलेल्या अंजनवेल गावात वसलेला एक ऐतिहासिक सागरी दुर्ग आहे.
वशिष्ठी नदीच्या (दाभोळ खाडी) मुखाशी असलेल्या २६० फूट उंच टेकडीवर स्थित गोपाळगड किल्ला ७ एकर परिसरात विस्तारलेला असून, येथून अरबी समुद्राचे नयनरम्य दृश्य दिसते. सुट्ट्यांमध्ये येथे आवर्जून फिरायला जा.
गोपाळगड किल्ला १६ व्या शतकातील एक ऐतिहासिक सागरी दुर्ग आहे. या किल्ल्यावरील भव्य तांबड्या दगडांच्या (जांभ्या दगडांच्या) तटबंदी, किल्ल्याच्या आवारातील आंब्याची बाग पाहायला मिळतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये आपल्या दाभोळ मोहिमेदरम्यान आदिलशाही सत्ताधाऱ्यांकडून गोपाळगड किल्ला जिंकून घेतला. त्यांनी या किल्ल्याचे मोक्याचे स्थान ओळखले, त्याचे बळकटीकरण केले, जहाजबांधणीसाठी गोदी उभारली आणि त्याला अधिकृतपणे 'गोपाळगड' असे नाव दिले.
गोपाळगड किल्ल्याला जाण्यासाठी चिपळूण हे जवळचे स्टेशन आहे. स्टेशनला उतरून अंजनवेल गावात जाण्यासाठी बस किंवा रिक्षा पकडा. अंजनवेल गावात गेल्यावर तेथून तुम्ही पुढे चालत गोपाळगड किल्ल्यावर पोहचाल. (किल्ल्याच्या इतिहासासंबंधित दिलेली माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली आहे. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.)
रत्नागिरीला गेल्यावर तेथील इतर किल्ल्यांना देखील भेट द्या. यात रत्नदुर्ग , विजयदुर्ग, जयगड किल्ला, सुवर्णदुर्ग, कनकदुर्ग आणि पूर्णगड या किल्ल्यांचा समावेश आहे.