Surabhi Jayashree Jagdish
जास्त साखर असलेले पदार्थ शरीरात अतिरिक्त कॅलरी जमा करतात. त्यामुळे वजन वाढण्याचा धोका वाढतो. विशेषतः साखरयुक्त पेये आणि मिठाई वारंवार खाल्ल्यास पोटाभोवती चरबी साचण्याची शक्यता जास्त असते.
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर रक्तातील ग्लुकोजची पातळी झपाट्याने वाढते आणि त्यानंतर ती लवकर कमीही होऊ शकते. अशा वारंवार होणाऱ्या चढ-उतारांमुळे थकवा, भूक आणि गोड खाण्याची इच्छा वाढू शकते आणि टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.
गोड पदार्थांचं जास्त सेवन केल्याने ट्रायग्लिसराइड्स वाढू शकतात आणि हार्ट अटॅकचा धोका वाढण्यास हातभार लागू शकतो. जास्त प्रमाणात फ्रुक्टोजयुक्त साखरेचं सेवन केल्यास लिव्हरमध्ये चरबी साचण्याचा धोका वाढू शकतो. मात्र एक महिना सगळे गोड पदार्थ बंद केले तर शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूयात.
मध, साखर, गूळ किंवा कोणत्याही प्रकारची साखर एक महिना खाणं पूर्णपणे बंद केल्यास एकूण कॅलरीचं सेवन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे काही लोकांमध्ये वजन आणि कंबरेचा घेर कमी होण्याची शक्यता असते.
एक महिना गोड पदार्थ टाळल्यास रक्तातील साखरेतील अचानक होणारे चढ-उतार कमी होऊ शकतात. त्यामुळे दिवसभर ऊर्जा अधिक स्थिर राहण्याचा अनुभव काही लोकांना येतो. मधुमेहाचा धोका असलेल्या व्यक्तींनाही याचा फायदा होऊ शकतो.
सुरुवातीचे काही दिवस गोड खाण्याची इच्छा तीव्र वाटू शकते परंतु कालांतराने ती कमी होण्याची शक्यता असते. चवीच्या संवेदनांमध्ये बदल होऊन नैसर्गिक गोड पदार्थ, जसे फळं, अधिक गोड वाटू लागतात.
गोड पदार्थांचं सेवन कमी केल्याने दातांवर जंतूंची वाढ आणि दात किडण्याचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. काही लोकांमध्ये त्वचेवरील मुरुम किंवा तेलकटपणा कमी झाल्याचं दिसून येतं. जरी याबाबतचे परिणाम प्रत्येक व्यक्तीत वेगवेगळे असू शकतात.