Shreya Maskar
कोकणातील किंवा कोकणाला जोडणारे घाट मार्गाने तुम्ही मित्रांसोबत भन्नाट रोड ट्रिप प्लान करू शकता. कोकण प्रदेशाजवळील घाट अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण ते किनारपट्टीवरील मैदानी प्रदेशाला दख्खनच्या पठाराशी जोडतात. हे घाट ऐतिहासिक व्यापाराचे महत्त्वपूर्ण मार्ग म्हणून कार्य करतात.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबोली घाट आहे. "महाराष्ट्राचे चेरापुंजी" म्हणून हे ठिकाण ओळखले जाते.हा संपूर्ण परिसर हिरव्यागार वनराईने आच्छादलेला असून, येथे अनेक धबधबे पाहायला मिळतात.
ताम्हिणी घाट पुणे - कोकण मार्गाला जोडतो. दख्खनच्या पठाराला कोकण पट्ट्याशी जोडणारा एक प्रमुख प्रवेशद्वार म्हणून ओळखला जातो. असंख्य धबधबे, धुक्यात हरवलेले डोंगर आणि घनदाट अरण्ये यासाठी हा घाट विशेष प्रसिद्ध आहे.
वरंधा घाट हा प्रामुख्याने पुणे जिल्ह्याला (भोर) रायगड जिल्ह्याशी (महाड) जोडणारा एक प्रमुख आणि निसर्गरम्य घाटमार्ग आहे. खोल आणि हिरव्यागार दऱ्या, उभे कडे आणि धुक्याची चादर, खडबडीत प्रदेश येथे पाहायला मिळतो.
कुंभारली घाट हा सातारा ते रत्नागिरी (चिपळूण) या मार्गाला जोडतो. सुंदर रस्ते आणि दुतर्फा अरण्ये असलेला हा मार्ग आहे. इतर काही तीव्र चढणीच्या घाटांच्या तुलनेत अधिक सुखद प्रवासाचा अनुभव देतो.
आंबा घाट हा सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जाणारा एक महत्त्वाचा मार्ग आहे, जो कोकणाला (रत्नागिरी जिल्हा) पश्चिम महाराष्ट्राशी (कोल्हापूर जिल्हा) जोडतो. घनदाट अरण्ये आणि चढ-उताराच्या टेकड्यांनी वेढलेला, जैवविविधतेने समृद्ध असा हा एक अप्रतिम घाट आहे.
तुम्ही कधीही या घाट मार्गाने प्रवास करू शकता. पण तुम्हाला निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे आवर्जून फिरायला जा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.