Surabhi Jayashree Jagdish
कामाख्या मंदिर आसाममधील गुवाहाटीमधील नीलाचल टेकडीवर स्थित असून भारतातील ५१ शक्तीपीठांपैकी एक मानलं जातं. दरवर्षी अंबुबाची मेळ्यादरम्यान मंदिर काही दिवस बंद ठेवलं जातं, कारण त्या काळात देवी रजस्वला असल्याची धार्मिक मान्यता आहे.
राजस्थानातील दौसा जिल्ह्यातील मेहंदीपूर बालाजी मंदिर भूतबाधा आणि नकारात्मक शक्तींपासून मुक्ती मिळवून देणारं स्थान म्हणून प्रसिद्ध आहे. याठिकाणी विशेष धार्मिक विधी केले जातात आणि अनेक मानसिक किंवा अदृश्य त्रास दूर होतो, असा विश्वास व्यक्त करतात.
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) याठिकाणी एलोरा लेण्यांमधील कैलास मंदिर हे जगातील सर्वात अद्भुत शैलकृती मंदिरांपैकी एक आहे. हे संपूर्ण मंदिर एका अखंड खडकातून वरून खाली कोरलं गेलं असून त्याच्या निर्मितीबाबत आजही अनेक प्रश्न उपस्थित केले जातात.
हिमाचल प्रदेशातील कांगडा जिल्ह्यातील ज्वालामुखी मंदिरात कोणतंही तेल किंवा वात नसताना नैसर्गिक ज्वाला सतत प्रज्वलित असल्याचं दिसतं. या ज्वाला देवीचं स्वरूप मानून भाविक त्यांची पूजा करतात. या नैसर्गिक घटनेमुळे आणि धार्मिक श्रद्धेमुळे हे मंदिर विशेष आकर्षणाचं केंद्र बनलंय.
आंध्र प्रदेशातील लेपाक्षी याठिकाणी वीरभद्र मंदिरातील स्तंभ जगभरातील पर्यटकांना आश्चर्यचकित करतो. या स्तंभाचा तळ जमिनीला पूर्णपणे टेकलेला नसतानाही तो मंदिराच्या रचनेत स्थिर आहे.
या सर्व मंदिरांचा इतिहास शेकडो ते हजारो वर्षांपूर्वीचा असून प्रत्येक मंदिराशी वेगवेगळ्या धार्मिक कथा आणि लोकमान्यता जोडलेल्या आहेत. अनेक आख्यायिका सांगितल्या जात असून त्या स्थानिक संस्कृतीचा महत्त्वाचा भाग बनल्या आहेत.
दरवर्षी या मंदिरांमध्ये लाखो भाविक आणि पर्यटक दर्शनासाठी येतात. धार्मिक महत्त्वाबरोबरच याठिकाणचा इतिहास, वास्तुकला आणि रहस्यमय वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकही भेट देतात.