Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्यात प्रशासन, न्याय, महसूल आणि लष्करी व्यवहार हे लोकांना समजतील अशा भाषेत चालावेत हा त्यांचा स्पष्ट हेतू होता. त्या काळात दरबारी फारसी व संस्कृतचा प्रभाव असला, तरी महाराजांनी व्यवहारभाषेला स्थान देत सामान्य प्रजेचा सहभाग वाढवला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मराठी ही प्रमुख व्यवहारभाषा होती. आदेश, सनद, पत्रव्यवहार आणि न्यायनिवाडे मराठीतून केले जात. यामुळे सामान्य प्रजेपर्यंत शासनाची माहिती थेट पोहोचत होती.
मराठी भाषा मुख्यतः मोडी लिपीत लिहिली जायाची. मोडी लिपी वेगवान लेखनासाठी उपयुक्त असल्याने दप्तरखान्यात ती वापरली जाई. आजही अनेक अस्सल कागदपत्रं मोडी लिपीत उपलब्ध आहेत.
धर्मविषयक ग्रंथ, स्तुतीपर लेखन आणि काही राजकीय संकल्पना संस्कृतमध्ये मांडल्या जात. राजाभिषेकावेळी वापरलेले मंत्र आणि श्लोक संस्कृतमध्ये होते.
त्या काळात दख्खनमध्ये फारसी ही सत्तेची भाषा मानली जात होती. परंतु शिवाजी महाराजांनी फारसीचा अतिरेक टाळला. परकीय सत्तांशी पत्रव्यवहार करताना आवश्यक तेव्हाच फारसी वापरली जात होती.
शिवाजी महाराजांच्या आदेशाने ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करण्यात आला. फारसी शब्दांना संस्कृत-मराठी शब्द देण्याचा हा प्रयत्न होता. यामुळे मराठी भाषेचा प्रशासनात दर्जा वाढला.
न्यायनिवाडे आणि दंडसंहिता मराठीतून मांडली जात. प्रजेला न्यायप्रक्रिया समजावी, हा यामागचा उद्देश होता. यामुळे लोकांचा प्रशासनावर विश्वास वाढला.