Surabhi Jayashree Jagdish
जगभरातील अनेक संशोधनांनुसार, हार्ट अटॅकची सर्वाधिक प्रकरणं सकाळी सुमारे ६ ते १२ वाजण्याच्या दरम्यान नोंदवली जातात. झोपेतून उठल्यानंतर शरीरात कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालिन या हार्मोनचं प्रमाण वाढतं. त्यामुळे रक्तदाब आणि हृदयाचे ठोके वाढू शकतात.
काही संशोधनांमध्ये हवामानातील अचानक बदल, जास्त आर्द्रता आणि तापमानातील चढ-उतार यांचा हृदयविकाराच्या घटनांशी संबंध आढळून आला आहे. पावसाळ्यात शरीरावर उष्णता आणि आर्द्रतेचा ताण येत असल्याने हृदयाला अधिक मेहनत करावी लागू शकते.
युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी (ESC) आणि इतर वैद्यकीय संशोधनांनुसार, सकाळच्या वेळेत हार्ट अटॅक होण्याची शक्यता दिवसातील इतर वेळांच्या तुलनेत साधारण ३०% ते ४०% अधिक असल्याचं काही अभ्यासांत दिसून आलंय.
उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल वाढलेलं असणं किंवा पूर्वी हार्ट अटॅक आलेला असणं अशा व्यक्तींमध्ये धोका अधिक असतो. अशा व्यक्तींनी पावसाळ्यात सकाळी अतिश्रम टाळणं, औषधं नियमित घेणं आणि त्रास जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
हार्ट अटॅकचं सर्वात सामान्य लक्षण म्हणजं छातीत दाब, जडपणा किंवा तीव्र वेदना जाणवणं. ही वेदना काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकू शकते किंवा मध्येच कमी-जास्त होऊ शकते. काही रुग्णांमध्ये ही वेदना डाव्या हातात, खांद्यात, मानेत किंवा जबड्यातही पसरू शकते.
कोणतंही मोठे शारीरिक काम न करता श्वास लागणं हे हार्ट अटॅकचं महत्त्वाचं लक्षण असू शकतं. त्याचबरोबर अचानक थंड घाम येणं, अशक्तपणा किंवा चक्कर येणं अशी लक्षणंही दिसू शकतात. विशेषतः ही लक्षणं छातीतील वेदनांसोबत दिसत असतील तर त्वरित वैद्यकीय मदत घेणं गरजेचं आहे.
काही व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकपूर्वी मळमळ, उलटी किंवा अपचनासारखा त्रास जाणवू शकतो. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेही रुग्णांमध्ये छातीतील वेदना कमी असूनही तीव्र थकवा किंवा अस्वस्थता हे प्रमुख लक्षण असू शकतं.