Surabhi Jayashree Jagdish
आपण खात असलेल्या अन्नाचं नीट पचन झालं नाही की शरीर लगेच काही संकेत देतं. सुरुवातीला ही लक्षणं किरकोळ वाटली तरी दुर्लक्ष केल्यास पोटाचे त्रास वाढू शकतात. अपचन झाल्यावर केवळ पोटच नाही तर संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम दिसतो.
जेवण झाल्यानंतर बराच वेळ पोट हलकं न वाटता जड राहते. ढेकर येऊनही आराम मिळत नाही. हे अपचन झाल्याचं एक लक्षण असतं.
अपचनामुळे पोटात गॅस तयार होतो. अशावेळी पोट फुगल्यासारखं दिसू लागतं. यावेळी बसताना किंवा वाकताना अस्वस्थता वाढू लागते.
पोटातील आम्ल वाढल्यामुळे छातीत जळजळ होऊ लागते. अशावेळी घशात आंबट पाणी येऊ लागतं. विशेषतः मसालेदार किंवा तेलकट जेवणानंतर त्रास वाढतो.
अन्न पचलं नाही की व्यक्तीला सतत मळमळ आणि उलटीचा त्रास होतो. यावेळी कधी कधी उलटी झाल्यावर थोडा आराम मिळतो.
अपचनामुळे पोटात कळा येऊ शकतात. यावेळी पोटाच्या वरच्या भागात दुखणं जाणवतं. दुखणं सतत किंवा मधूनमधून वाढू शकतं.
अन्न नीट न पचल्याने शौच्याच्या सवयीमध्ये बदल होतात. कधी जुलाब तर कधी बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. हे अन्न नीट न पचल्याचे संकेत आहेत.
अपचनामुळे भूक लागत नाही. याशिवाय तोंडाला कडू किंवा नकोशी चव येते. यावेळी त्या व्यक्तीला आळशी, थकल्यासारखं वाटू लागतं.