Surabhi Jayashree Jagdish
चपातीमध्ये असलेले संमिश्र कार्बोहायड्रेट शरीराला हळूहळू ऊर्जा पुरवतात आणि दिवसभर कार्यक्षम राहण्यास मदत करतात. संपूर्ण गव्हाच्या चपातीत फायबर असल्यामुळे पचन सुधारण्यास आणि पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटण्यास मदत होते. त्यामध्ये बी समूहातील जीवनसत्त्वं, लोह, मॅग्नेशियम आणि इतर खनिजंही काही प्रमाणात मिळतात.
फक्त चपाती खाल्ल्यामुळे वजन वाढत नाही, तर दिवसभरातील एकूण कॅलरीचं प्रमाण जास्त झाल्यास वजन वाढतं. योग्य प्रमाणात चपाती, भरपूर भाज्या, डाळी आणि प्रोटीनसोबत खाल्ल्यास ती संतुलित आहाराचा भाग ठरू शकते.
चपातीसोबत प्रोटीन आणि भाज्या घेतल्यास रक्तातील साखर झपाट्याने वाढण्याची शक्यता कमी होते. वय, वजन, शारीरिक हालचाल आणि आरोग्यानुसार चपातीचं प्रमाण ठरवणं अधिक योग्य ठरतं.
चपाती हा अनेकांसाठी कार्बोहायड्रेटचा मुख्य स्रोत असल्यामुळे ती पूर्णपणे बंद केल्यास काहींना थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो. शरीर मग इतर अन्नपदार्थांमधून किंवा साठवलेल्या ऊर्जेतून ऊर्जा मिळवण्याचा प्रयत्न करते.
चपाती बंद केल्याने काही लोकांचं वजन कमी होऊ शकतं. पण त्याचं मुख्य कारण एकूण कॅलरी कमी होणं असतं. उलट चपातीऐवजी जास्त तळलेले किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ले तर वजन वाढण्याची शक्यता असते.
संपूर्ण गव्हाच्या चपातीमधून मिळणारे फायबर बंद झाल्यास काही लोकांमध्ये बद्धकोष्ठतेची समस्या निर्माण होऊ शकते. विशेषतः भाज्या, फळे आणि इतर संपूर्ण धान्यांचे सेवन कमी असेल तर पचनावर अधिक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चपाती बंद करताना फायबरचे इतर स्रोत आहारात वाढवणे आवश्यक असते.
चपाती पूर्णपणे बंद केल्यास गव्हातून मिळणारे काही पोषक घटक कमी पडू शकतात. त्यासाठी ओट्स, ज्वारी, बाजरी, नाचणी, ब्राऊन राईस, डाळी आणि कडधान्यांचा संतुलित समावेश करणं गरजेचं आहे.