Surabhi Jayashree Jagdish
मृत्यू हा जीवनाचा अटळ भाग आहे. एखादी व्यक्ती आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचल्यावर शरीरात काही विशिष्ट बदल दिसू लागतात.तज्ज्ञांच्या मते, मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या २४ तासांत शरीर हळूहळू काम करणं कमी करते आणि त्याची काही स्पष्ट चिन्हं दिसू लागतात.
मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या २४ तासांत श्वासोच्छवास अनियमित होऊ शकतो. काही वेळा श्वास खूप मंद होतो तर काही वेळा वेगाने चालू लागतो आणि मध्येच काही सेकंद थांबू शकतो. हा बदल शरीराची कार्यक्षमता कमी होत असल्याचं महत्त्वाचं लक्षण मानलं जातं.
रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे हात-पाय थंड पडू लागतात. त्वचा फिकट, निळसर दिसू शकते. शरीराच्या काही भागांमध्ये उष्णता कमी झाल्याने हे बदल अधिक स्पष्टपणे जाणवतात.
मृत्यू जवळ आल्यावर व्यक्ती कमी बोलू लागते आणि बाहेरील गोष्टींमध्ये रस कमी दाखवते. अनेकदा ती झोपलेल्या अवस्थेतच राहते किंवा डोळे उघडे असूनही प्रतिसाद देत नाही. कुटुंबीयांशी संवाद साधण्याची इच्छाही कमी होत जाते.
शरीराची ऊर्जा संपत आल्याने व्यक्ती बहुतांश वेळ झोपेत घालवते. जागं असतानाही ती थकलेली किंवा गुंगीमध्ये असल्यासारखी दिसू शकते. काही लोकांना आवाज दिल्यावर किंवा स्पर्श केल्यावरही फारसा प्रतिसाद मिळत नाही.
अखेरच्या टप्प्यात भूक आणि तहान दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी होतात. व्यक्ती अन्न किंवा पाणी घेण्यास नकार देऊ शकते किंवा गिळण्यास त्रास होऊ शकतो. शरीराला ऊर्जा आणि द्रवपदार्थांची गरज कमी होत गेल्याने हा बदल दिसून येतो.
काही व्यक्तींना शेवटच्या तासांत गोंधळल्यासारखं वाटू शकतं. त्यांना कुटुंबातील सदस्यांची ओळख पटण्यात अडचण येऊ शकते किंवा ते कमी स्पष्टपणे बोलू शकतात. काही वेळा अस्वस्थता, बेचैनी किंवा भ्रमासारखी स्थितीही दिसून येते.