Surabhi Jayashree Jagdish
शरीरात रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होत नसेल तर त्याचे परिणाम हळूहळू संपूर्ण आरोग्यावर दिसू लागतात. अनेकदा लोक थकवा, हात-पाय गार पडणं किंवा सूज येणं यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. मात्र ही लक्षणं रक्तप्रवाह योग्य नसल्याची असू शकतात.
शरीरात पुरेशा प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजन पोहोचत नसेल, तर सतत थकवा जाणवू शकतो. अगदी कमी काम केल्यानंतरही शरीर अशक्त वाटू लागतं. दिवसभर ऊर्जा कमी असल्यास हे खराब रक्ताभिसरणाचं लक्षण असू शकतं.
जास्त वेळ बसून किंवा उभं राहिल्यानंतर पायांना सूज येत असेल तर ते रक्तप्रवाह नीट नसल्याचे संकेत असू शकतात. हृदय शरीरात रक्त योग्य वेगाने पंप करू शकत नसल्यामुळे ही समस्या वाढते. विशेषतः घोटे आणि पाय जड वाटणे हे दुर्लक्षित करू नये.
शरीरातील रक्तप्रवाह कमी असल्यास जखमांना आवश्यक पोषण आणि ऑक्सिजन वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कट, खरचटणं किंवा संसर्ग भरून येण्यास जास्त वेळ लागू शकतो.
त्वचेवर फुगलेल्या आणि वाकड्या-तिकड्या शिरा दिसू लागणं हे खराब रक्तप्रवाहाचं लक्षण असू शकतं. विशेषतः पायांवर निळसर किंवा जांभळ्या रंगाच्या शिरा स्पष्ट दिसतात. या शिरांमध्ये रक्त साचल्यामुळे वेदना आणि जडपणा जाणवू शकतो.
मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात रक्त पोहोचत नसेल तर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येऊ शकते. हळूहळू स्मरणशक्ती कमजोर होण्याची शक्यता वाढते. वारंवार विसरणं किंवा गोंधळल्यासारखं वाटणं हेही रक्ताभिसरणाशी संबंधित असू शकतं.
हात किंवा पायांमध्ये वारंवार झिणझिण्या येणं हे रक्तप्रवाह कमी झाल्याचे संकेत असू शकतात. काही वेळा हात-पाय सुन्न पडल्यासारखेही वाटतात. ही समस्या सतत होत असल्यास तिला दुर्लक्ष करू नये.