Surabhi Jayashree Jagdish
पायांना रक्तपुरवठा कमी होण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे धमन्यांमध्ये चरबी साचून त्या अरुंद होणं. या स्थितीला पेरिफेरल आर्टरी डिसीज असं म्हणतात. त्यामुळे पायांच्या स्नायूंना आवश्यक तितका रक्तप्रवाह मिळत नाही.
मधुमेह, उच्च रक्तदाब आणि वाढलेलं कोलेस्टेरॉल यामुळे रक्तवाहिन्यांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे रक्तप्रवाह हळूहळू कमी होत जातो. या आजारांवर योग्य नियंत्रण न ठेवल्यास पायांतील रक्ताभिसरण अधिक बिघडू शकतं.
धूम्रपानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. दीर्घकाळ बसून राहणं किंवा शारीरिक हालचाल कमी असणंही रक्ताभिसरण मंदावण्यास कारणीभूत ठरतं. नियमित व्यायामाचा अभाव पायांपर्यंत रक्त पोहोचण्यात अडथळा निर्माण करू शकतो.
हृदयाची पंप करण्याची क्षमता कमी झाल्यास शरीराच्या खालच्या भागात रक्तपुरवठा कमी होऊ शकतो. काही रक्तवाहिन्यांच्या विकारांमुळेही पायांपर्यंत पुरेसा रक्तप्रवाह पोहोचत नाही. त्यामुळे पायांमध्ये विविध तक्रारी जाणवू लागतात.
पाय सतत थंड वाटणं हे रक्ताभिसरण कमी झाल्याचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा वाढलेल्या कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींमध्ये हे अधिक दिसून येते. पाय थंड राहण्यासोबतच बधिरपणा, वेदना किंवा त्वचेचा फिकट अथवा निळसर रंग दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
रक्तप्रवाह नीट न झाल्यास पायांच्या खालच्या भागात द्रव साचू लागतो. त्यामुळे घोटे सुजणे, त्वचा ताणल्यासारखी वाटणं किंवा त्वचेचा पोत बदलणं अशी लक्षणं दिसू शकतात. एका पायात अचानक सूज, वेदना किंवा लालसरपणा दिसल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे.
चालताना किंवा जिने चढताना पायांच्या स्नायूंना अधिक ऑक्सिजनची गरज असते. रक्तपुरवठा कमी असल्यास ही गरज पूर्ण होत नाही आणि त्यामुळे पोटरीत गोळे येऊ शकतात. वारंवार रात्री गोळे येणे किंवा चालल्यानंतर वेदना वाढणं हे महत्त्वाचं लक्षण मानले जाते.