Surabhi Jayashree Jagdish
जयपूरचं प्रसिद्ध हवा महल हे भारतातील सर्वात सुंदर आणि ऐतिहासिक स्मारकांपैकी एक मानलं जातं. या भव्य वास्तूमुळेच जयपूर शहराला वेगळी ओळख मिळाली आहे.
दरवर्षी हजारो पर्यटक खास हवा महल पाहण्यासाठी येतात.
हवा महलची अप्रतिम रचना आणि नक्षीकाम पाहून लोक अक्षरशः भारावून जातात. प्रत्येक पर्यटक या वास्तूसोबत फोटो काढतो. सोशल मीडियावरही हवा महलचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.
या ऐतिहासिक वास्तूचं बांधकाम इ.स. 1799 मध्ये महाराजा सवाई प्रताप सिंह यांनी करवून घेतलं होतं. राजस्थानी आणि मुघल स्थापत्यकलेचा सुंदर संगम या महालात पाहायला मिळतो. आजही ही वास्तू त्या काळातील समृद्ध इतिहासाची साक्ष देते.
हवा महलमध्ये एकूण पाच मजले असून प्रत्येक मजल्याला वेगवेगळं नाव देण्यात आलं आहे. शरद मंदिर, रतन मंदिर, विचित्र मंदिर, प्रकाश मंदिर आणि हवा मंदिर अशी त्यांची नावं आहेत. प्रत्येक भागाची रचना आणि सौंदर्य पर्यटकांना खास आकर्षित करतं.
हवा महलच्या मागील बाजूस तब्बल 365 जाळीदार खिडक्या आहेत. या खास रचनेमुळे महालात नेहमी थंड हवा खेळती राहते. याच झरोख्यांजवळ सर्वाधिक पर्यटक फोटो काढताना दिसतात.
इतकी भव्य वास्तू त्या काळात उभारण्यासाठी किती खर्च आला असेल, हा प्रश्न अनेकांना पडतो. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत नोंद किंवा कागदपत्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे हवा महलच्या मूळ बांधकामाचा नेमका खर्च आजही गूढच आहे.
हवा महलची दुरुस्ती आणि देखभाल वेळोवेळी करण्यात येते. सन 2006 मध्ये या वास्तूच्या दुरुस्तीचं मोठं काम करण्यात आलं होतं. त्या वेळी या कामासाठी सुमारे 46 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता.