Surabhi Jayashree Jagdish
चहा हा भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. सकाळची सुरुवात असो, दुपारचा थकवा घालवायचा असो किंवा संध्याकाळी निवांत क्षण घालवायचे असोत, अनेकांच्या हातात चहाचा कप असतो. मात्र चहामध्ये कॅफीन असल्याने त्याचे प्रमाण आणि वेळ या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.
न्यूट्रिशनिस्टच्या मते, चहा प्यायची सवय असल्यास दिवसाला साधारण २ ते ३ कपांपर्यंत प्रमाण मर्यादित ठेवणं योग्य आहे. वारंवार चहा पिण्याची सवय असल्यास प्रत्येक कपामधील अंतर ठेवणं महत्त्वाचं आहे.
सकाळी उठल्यानंतर लगेच चहा पिण्याची सवय अनेकांना असते, मात्र ही सवय बदला. रिकाम्या पोटी चहा घेतल्याने काही लोकांना अॅसिडिटी, पोटात जळजळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर आधी पाणी घेऊन काही वेळाने नाश्त्यानंतर चहा घेणे अधिक योग्य ठरू शकते.
चहामध्ये नैसर्गिकरित्या कॅफीन असते आणि त्याचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा होऊ शकतो. जास्त कॅफीन घेतल्यास काही लोकांना अस्वस्थता, हृदयाचे ठोके जाणवणे किंवा झोपेवर परिणाम होण्याचा अनुभव येऊ शकतो.
चहातील कॅफीन झोपेवर परिणाम करू शकत असल्याने संध्याकाळनंतर चहा घेण्याची वेळ प्रत्येकाने आपल्या झोपेच्या वेळेनुसार ठरवावी. रात्री लवकर झोपणाऱ्या व्यक्तींनी उशिरा घेतलेला चहा टाळणं चांगलं आहे.
चहा हेल्दी ठेवायचा असेल तर त्यामध्ये घातली जाणारी साखर कमी ठेवणं महत्त्वाचं आहे. दिवसातून अनेक कप चहा घेताना प्रत्येक कपातील साखरेचं प्रमाण वाढत जातं आणि त्यामुळे एकूण साखरेचं सेवनही वाढू शकतं.
चहासोबत बिस्किटं, नमकीन किंवा तळलेले पदार्थ खाण्याची सवय असेल तर ते धोकादायक आहे. अशा पदार्थांचे वारंवार सेवन केल्यास चहापेक्षा अतिरिक्त साखर, मीठ आणि चरबीचे सेवन वाढू शकतं. त्याऐवजी चहासोबत हलका आणि पौष्टिक नाश्ता निवडा.
दिवसाला २ ते ३ कप असले तरी कॅफीनची संवेदनशीलता प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळी असू शकते. गर्भावस्था, काही औषधं, झोपेच्या समस्या किंवा कॅफीनमुळे होणारी अस्वस्थता अशा परिस्थितीत चहाचे प्रमाण वैयक्तिक गरजेनुसार ठरवावं.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.