Surabhi Jayashree Jagdish
जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्याची शक्यता काही प्रमाणात कमी होऊ शकते. विशेषतः टाइप-२ मधुमेह किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्या व्यक्तींमध्ये हा परिणाम अधिक दिसू शकतो.
पाणी स्वतः रक्तातील ग्लुकोजचं चयापचय किंवा आतड्यातील ग्लुकोजचं शोषण थेट बदलत नाही. त्यामुळे केवळ पाणी प्यायल्याने रक्तातील साखर कमी होते, असं म्हणणं योग्य ठरणार नाही.
जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने लवकर पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे व्यक्ती कमी प्रमाणात आणि अधिक हळूहळू जेवते. अन्नाचं प्रमाण कमी झाल्यास जेवणानंतर रक्तातील साखरेतील वाढ तुलनेने नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.
शरीरात पुरेसं पाणी असल्यास किडनीचं कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. किडनी अतिरिक्त साखर लघवीद्वारे बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणं रक्तातील साखरेचं एकूण मॅनेजमेंट करण्यासाठी अप्रत्यक्षपणे उपयुक्त ठरू शकतं.
टाइप-२ मधुमेह, प्रीडायबिटीज किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स असलेल्या व्यक्तींना जेवणापूर्वी पाणी पिण्याचा अधिक फायदा होऊ शकतो. जादा वजन किंवा मेटाबॉलिक सिंड्रोम असलेल्या व्यक्तींनाही ही सवय वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करू शकते.
निरोगी व्यक्तींमध्ये जेवणापूर्वी किंवा जेवणासोबत पाणी पिण्यामुळे पचनक्रिया किंवा पोषकद्रव्यांच्या शोषणात अडथळा येत नाही. उलट पाणी अन्नातील पोषक घटक विरघळण्यास आणि अन्न पचनमार्गातून पुढे जाण्यास मदत करते.
गॅस्ट्रोपेरेसिस (पोट रिकामे होण्यास उशीर होणं) किंवा तीव्र अॅसिड रिफ्लक्सचा त्रास असलेल्या व्यक्तींनी जेवणापूर्वी जास्त प्रमाणात पाणी पिणं टाळावं. अशा परिस्थितीत पोटातील दाब वाढून त्रास अधिक जाणवू शकतो.
ही माहिती केवळ जागरूकता आणि सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असू शकते, त्यामुळे कोणताही वैद्यकीय निर्णय घेण्यापूर्वी किंवा आहारात बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.