ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
तिळगुळ हा मकर संक्रांतीचा खास प्रसाद आहे. हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारा हा पदार्थ आरोग्यासाठीही उपयुक्त मानला जातो.
पांढरे तीळ , गूळ , वेलची पावडर, तूप , सुके खोबरे किसलेले आणि बदाम काजू काप इ. साहित्य लागते.
एक कढई घ्या. त्या कढईत तीळ मंद आचेवर ठेवून सतत भाजा. तिळाचा सुगंध किंवा हलका सोनेरी रंग आल्यास गॅस बंद करावा. भाजताना तीळ जळणार नाहीत याची काळजी घ्यावी.
दुसऱ्या कढईत तूप घालून किसलेला गूळ मंद आचेवर वितळवून घ्यावा. गूळ पूर्ण वितळल्यानंतर त्यात वेलची पावडर घाला. फार उकळू देऊ नका.
वितळलेल्या गुळात भाजलेले तीळ घालून नीट मिक्स करा. त्यानंतर सुके खोबरे आणि ड्रायफ्रूट्स ही टाका.आता लाडूचे मिश्रण तयार आहे.
मिश्रण थोडे गरम असतानाच लाडू वळायला घ्यावे. हाताला दूध पाणी किंवा तूप लावून छोटे-छोटे लाडू वळा. गरम असतानाच वळणे सोपे जाते.
तिळ मंद आचेवरच नेहमी भाजून घ्या. तसेच गूळ जास्त उकळवून देऊ नका. मिश्रण तयार झाल्यानंतर खूप थंड होण्याआधी गरम गरम लाडू वळून घ्यावे.
तिळ गरम असल्यामुळे शरीराला उष्णता देतात. तसेच हाडे मजबूत करतात आणि पचन सुधारण्यास मदत करतात. हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू आवर्जून खाल्ले जातात.
तिळगुळ लाडू हवाबंद डब्यात ठेवल्यास 10 ते 12 दिवस टिकून राहतात.