Surabhi Jayashree Jagdish
तुम्हीही सकाळी उठल्या उठल्या कोमट पाण्यात लिंबू पिळून पीत असाल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, वजन कमी करण्यापासून ते पचन सुधारण्यापर्यंत अनेक फायदे सांगितले जातात.
परंतु तुम्ही किती विचार केलाय का, अॅसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे खरंच फायदेशीर आहे का. तज्ज्ञांच्या मते, लिंबूपाणी काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतं तर काहींसाठी ते त्रास वाढवणारंही ठरू शकतं.
लिंबाचा रस चवीला आंबट आणि आम्लयुक्त असला तरी शरीरात पचन झाल्यानंतर त्याचे काही घटक अल्कलाइन स्वरूपात काम करतात. त्यामुळे पोटातील अतिरिक्त आम्ल कमी करण्यास मदत होऊ शकते.
लिंबूपाणी प्यायल्याने यकृतातून अधिक प्रमाणात पित्त तयार होते. हे पित्त अन्न पचवण्याची प्रक्रिया सुधारतं आणि जेवणानंतर होणारी गॅस, जळजळ किंवा अॅसिडिटी कमी करण्यास मदत करू शकतं.
प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती वेगळी असते. ज्यांना आधीपासून तीव्र अॅसिडिटी, पोटात अल्सर किंवा वारंवार छातीत जळजळ होण्याचा त्रास आहे, त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे. तसंच ज्यांना अॅसिड रिफ्लक्सचा त्रास आहे, त्यांच्यासाठी लिंबातील सिट्रिक अॅसिड त्रासदायक ठरू शकते.
अॅसिडिटी कमी करण्यासाठी लिंबूपाणी प्यायचं असल्यास या गोष्टी लक्षात ठेवा. एका ग्लास कोमट किंवा साध्या पाण्यात अर्धे लिंबू किंवा एक छोटा चमचा लिंबाचा रस पुरेसा असतो. लिंबाचा रस कधीही थेट पिऊ नये.
लिंबाच्या रसात साखर टाकणं टाळा. कारण त्यामुळे अॅसिडिटी वाढण्याची शक्यता असते. चव वाढवण्यासाठी थोडं काळं मीठ किंवा भाजलेलं जिरे घालू शकता. हेवी जेवणानंतर सुमारे अर्ध्या तासाने लिंबूपाणी प्यायल्यास पचन सुधारण्यास मदत होऊ शकते.