Surabhi Jayashree Jagdish
सकाळी उठताच पाणी पिण्याची सवय अनेकांच्या आयुष्याचा एक भाग असतो. काही जण याला आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानतात तर काहीजण याकडे केवळ एक समज म्हणून पाहतात.
सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने पोट साफ होतं का, हा प्रश्न अनेकांना पडतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ही गोष्ट पूर्णपणे चुकीची नाही. याचा पचनसंस्थेशी याचा थेट संबंध आहे.
बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टिपेशन ही आजकालची सामान्य समस्या आहे. शरीरात पाण्याची आणि फायबरची कमतरता हे यामागचं मुख्य कारण असू शकतं. अशा वेळी सकाळी पाणी पिण्याची सवय ही समस्या कमी करण्यास मदत करू शकते.
सकाळी पाणी प्यायल्यावर काहींना लगेच शौचाला जावंसं का वाटतं. यामागेही वैज्ञानिक कारण आहे. जेव्हा आपण काही खातो किंवा पाणी पितो, तेव्हा मोठ्या आतड्याची हालचाल वाढते. त्यामुळे मलविसर्जनाची इच्छा निर्माण होते.
पचन प्रक्रियेत, अन्नातील पोषक घटक लहान आतड्यात शोषले जातात आणि उरलेला भाग मोठ्या आतड्यात जातो. मोठं आतडं त्यातून पाणी शोषून मल तयार करतं. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल, तर आतडं जास्त पाणी शोषतं, त्यामुळे मल अधिक कडक आणि कोरडा होतो, आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढते.
पुरेसं पाणी प्यायल्याने मल सहज बाहेर पडतो. त्यामुळेच बद्धकोष्ठतेवर पाणी उपयुक्त ठरतं, असं म्हटलं जातं. मात्र, केवळ पाणी पिणं पुरेसं नाही. जर आहारात फायबर कमी असेल, तर त्याचा फायदा मर्यादित राहू शकतो.
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी दिवसाला किमान ८ ते १० ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. काही वेळा, विशेषतः शरीरात पाण्याची कमतरता असल्यास, यापेक्षा जास्त पाणी पिणंही फायदेशीर ठरू शकतं.