Surabhi Jayashree Jagdish
किडनी रक्तातील टाकाऊ पदार्थ, अतिरिक्त पाणी आणि टॉक्सिन घटक लघवीद्वारे बाहेर टाकते. ती शरीरातील पाणी, सोडियम, पोटॅशियम आणि इतर खनिजांचं संतुलन राखून शरीराचं कार्य सुरळीत चालण्यास मदत करतं.
मधुमेहामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण दीर्घकाळ वाढलेलं राहिल्यास किडनीतील सूक्ष्म रक्तवाहिन्यांचं नुकसान होतं. त्यामुळे रक्त शुद्ध करण्याची किडनीची क्षमता हळूहळू कमी होत जाते. वेळेवर मधुमेह नियंत्रणात न ठेवल्यास दीर्घकालीन किडनी विकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
उच्च रक्तदाबामुळे किडनीतील रक्तवाहिन्यांवर सतत ताण येतो आणि त्याचं कार्य बिघडू शकतं. जास्त मीठ, प्रक्रिया केलेले पदार्थ, जंक फूड, धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयींमुळे किडनीवर अतिरिक्त ताण पडतो.
पेनकिलर्स औषधांचा दीर्घकाळ किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापर केल्यास किडनीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. वारंवार होणारे युरीनरी इन्फेक्शन, किडनी स्टोन आणि काही आनुवंशिक आजारांमुळेही किडनीची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
किडनीचे अनेक आजार सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणं दाखवत नाहीत. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कुटुंबात किडनीच्या आजाराचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी नियमित रक्त आणि लघवीच्या तपासण्या करून घ्याव्यात.
किडनी नीट काम करत नसल्यास शरीरातील अतिरिक्त पाणी आणि मीठ बाहेर टाकलं जात नाही. त्यामुळे पाय, घोटे, हात किंवा चेहऱ्यावर सूज येऊ शकते आणि सकाळी डोळ्यांभोवती सूज दिसू शकते.
लघवीचे प्रमाण अचानक वाढणं किंवा कमी होणं, रात्री वारंवार लघवीला जाणं किंवा लघवीत फेस येणं ही किडनीच्या बिघाडाची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. काही रुग्णांच्या लघवीत रक्त दिसू शकतं किंवा लघवीचा रंग बदललेला जाणवू शकतो.