Surabhi Jayashree Jagdish
मुलं अनेकदा काही गोष्टी पालकांपासून लपवतात कारण त्यांना ओरडा बसेल या भीतीने. कधी कधी ते पालकांना काळजी होऊ नये म्हणून शांत राहतात. काही वेळा त्यांना परिस्थितीची गंभीरता स्वतःलाच समजत नाही. मात्र मुलं लपवत असलेल्या कोणत्या गोष्टींकडे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे ते पाहूयात.
मुलं खेळताना प्राण्यांशी संपर्कात येतात आणि कधी कधी त्यांना ओरखडा किंवा चावा लागू शकतो. ते याला किरकोळ जखम समजून लपवतात. मात्र अशा जखमांमुळे संसर्ग किंवा रेबीजसारखे धोके निर्माण होऊ शकतात.
कधी कधी अनोळखी व्यक्ती मुलांशी बोलण्याचा किंवा त्यांना काही देण्याचा प्रयत्न करू शकते. मुले भीतीमुळे किंवा गोंधळामुळे ही गोष्ट लपवू शकतात. पण ही परिस्थिती अत्यंत धोकादायक ठरू शकते.
खेळताना मुलं पडणं किंवा डोक्याला मार लागणे सामान्य असते. पण डोक्याला झालेली कोणतीही इजा गंभीर ठरू शकते हे मुले अनेकदा समजून घेत नाहीत. ते खेळ थांबेल या भीतीने ही गोष्ट लपवतात.
शाळेत किंवा इतर ठिकाणी काही मुलं इतरांना त्रास देतात किंवा धमकावतात. अशा गोष्टी मुलं लाजेमुळे किंवा भीतीमुळे सांगत नाहीत. सततचा मानसिक किंवा शारीरिक त्रास त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम करतो.
आज मुले मोबाईल आणि इंटरनेटचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. कधी कधी त्यांना चुकीचे मेसेज, फोटो किंवा अनोळखी व्यक्तींचा संपर्क येऊ शकतो. शिक्षा होईल किंवा इंटरनेट बंद होईल या भीतीने ते हे लपवतात.
मुलांना कठोर शिक्षा नव्हे तर समजून घेणे आणि आधाराची गरज असते. पालकांची प्रतिक्रिया किती शांत आणि समजूतदार आहे यावर मुलांचा विश्वास ठरतो.