Surabhi Jayashree Jagdish
दही खाण्यासाठी दिवसाची वेळ, विशेषतः दुपारची वेळ अधिक योग्य मानली जाते. दुपारी जेवणासोबत किंवा जेवणानंतर थोड्या प्रमाणात दही खाल्ल्यास ते सहज पचतं. या वेळी शरीराची पचनक्रिया तुलनेने चांगली असल्यामुळे दह्यातील पोषक घटकांचा फायदा मिळू शकतो.
पावसाळ्यात रात्री दही खाल्ल्यास काही लोकांना सर्दी, खोकला किंवा कफ वाढल्यासारखा त्रास जाणवू शकतो. रात्री शरीराची पचनक्रिया मंद होते त्यामुळे दही पचण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे रात्रीच्या जेवणात दही घेणं शक्यतो टाळावं.
काही लोकांना सकाळी रिकाम्या पोटी दही खाल्ल्याने अॅसिडिटी, गॅस किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते. ज्यांना पचनाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी उपाशीपोटी दही खाणं टाळावं. दही खायचं असल्यास ते नाश्ता किंवा जेवणासोबत घेणं चांगलं ठरतं.
दह्यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन B12 आणि प्रोबायोटिक्स यांसारखे पोषक घटक आढळतात. हे घटक आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियांचं संतुलन राखण्यास मदत करतात. दही पचनसंस्था मजबूत करण्यास आणि शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास सहाय्यक ठरू शकते.
पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रतेमुळे अन्नपदार्थ लवकर खराब होऊ शकतात, त्यामुळे ताजं दहीच खावं. जास्त आंबट झालेलं किंवा बराच वेळ बाहेर ठेवलेलं दही खाणं टाळावं. दही नेहमी स्वच्छ आणि योग्य पद्धतीने साठवलेलं असणं आवश्यक आहे.
ज्यांना दही पचतं त्यांच्यासाठी ते पावसाळ्यातही आरोग्यदायी पर्याय ठरू शकतं. मात्र सर्दी, खोकला, कफ किंवा दुधाचे पदार्थ न पचण्याची समस्या असलेल्या लोकांनी दही खाताना काळजी घ्यावी.