Shreya Maskar
कोकण हे पर्यटकांचे आकर्षण आहे. परदेशी पर्यटकही येथे गर्दी करतात. कोकणात गेल्यावर रत्नागिरी फिरायला नक्की जा. येथे समुद्रकिनारे, किल्ले, मंदिरे , हिल स्टेशन्स पाहायला मिळतात.
बाणकोट किल्ला ज्याला हिम्मतगड किंवा फोर्ट व्हिक्टोरिया म्हणूनही ओळखले जाते. हा रत्नागिरी जिल्ह्यात सावित्री नदीच्या मुखाशी वसलेला एक किनारी किल्ला आहे.
येथून अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. जवळच्या प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये वेळास गाव , हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन यांचा समावेश आहे. तुम्ही येथे फॅमिलीसोबत वीकेंड ट्रिप प्लान करू शकता.
बाणकोट किल्ल्याला जाण्यासाठी अनेकदा बागमांडला ते वेसवी दरम्यानच्या फेरीचा (बोटीचा) वापर केला जातो. त्यामुळे तुम्हाला येथे सूर्यास्ताचा सुंदर नजारा दिसतो.
बाणकोट किल्ला रत्नागिरी जिल्ह्यातील १६ व्या शतकातील जलदुर्ग आहे. सावित्री नदीच्या मार्गाने होणाऱ्या व्यापाराचे रक्षण करण्यासाठी बाणकोट किल्ला उभारण्यात आला होता.
१७०० च्या दशकात मराठा आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून बाणकोट किल्ला जिंकला आणि त्याचे नाव 'हिम्मतगड' असे ठेवले.
बाणकोट किल्ला साधारण आयताकृती असून त्याचे क्षेत्रफळ एक एकरपेक्षा कमी आहे. याचे संपूर्ण बांधकाम लालसर जांभा दगडात करण्यात आले आहे. किल्ल्याची तटबंदी ८ फूट रुंद आणि ३० फूट उंच आहे. तटबंदीवर एकूण सात मजबूत बुरुज आहेत. मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असून तो पश्चिमेला समुद्राच्या बाजूला दोन बुरुजांच्या मध्ये बांधलेला आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.