Shreya Maskar
जेव्हा मुलाला एकाच कामासाठी शाळा, घर आणि शिकवणी अशा तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून सूचना मिळतात, तेव्हा त्यांच्या मनात गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे मुलांना अभ्यासाचे टेन्शन वाढते.
शाळेत असताना मुलाला वाटते की ते घरी अभ्यास करतील, तर घरी असताना त्यांना वाटते की ते ट्युशनला शिकतील, त्यामुळे मुलं कुठेच नीट लक्ष देत नाही. हळूहळू मुलं अभ्यासाची जबाबदारी पुढे ढकलतात.
मुल प्रत्येक गोष्टीसाठी कोणावर तरी अवलंबून राहू लागतात, तेव्हा त्यांच्यात स्वतःहून गोष्टी करण्याची जबाबदारीची भावना विकसित होत नाही.
मुलाला शिकवणीला पाठवण्याचा सर्वात मोठा परिणाम त्याच्या आत्मविश्वासावर होतो. जेव्हा मुलाला स्वतःहून अभ्यास करण्याची सवय लागत नाही, तेव्हा त्यांच्यातील क्षमतांची त्यांना जाणीव होत नाही, परिणामी आत्मविश्वास हळूहळू कमी होतो.
मुलांच्या मानसिक विकासावरही परिणाम होतो. मुलं स्वतःच्या डोक्याने आणि मनाने विचार करण्यापेक्षा इतरांवर जास्त अवलंबून राहतात आणि इतरांचे अनुकरण करतात.
शाळेनंतर क्लासमध्ये जास्त वेळ घालवल्याने मुलांना स्वतःसाठी वेळ मिळत नाही. त्यांना अभ्यासा व्यतिरिक्त इतर छंद जोपासता येत नाही. तसेच इतरांशी संवाद कमी होतो. भावनिक बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्ये विकसित करण्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात.
अनेक क्लासेसमध्ये मुलांच्या परीक्षेतील गुणांनुसार त्यांच्यात तुलना केली जाते, ज्याचा परिणाम मुलांच्या मानसिकतेवर होतो. यामुळे लहान मुलांमध्ये चिंता वाढू शकते आणि त्यांना स्वतःबद्दल न्यूनगंड वाटू शकतो.
ट्युशनमध्ये अधिक वेळ घालवल्यामुळे मुलांचे पालकांसोबतचे कनेक्शन कमी होते. परिणामी पालक आणि मुलांत दुरावा येतो. तसेच मुलांना वाईट सवयी देखील लागू शकतात, ज्या विषयी पालकांना काहीच माहित नसते.