Surabhi Jayashree Jagdish
मुंबईत गेल्या ३६ तासांत सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून १२ अल्पवयीन मुलं बेपत्ता झाल्याची माहिती आहे. यामध्ये आठ मुली बेपत्ता झाल्याने शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता अंतर्गत अपहरणाचे गुन्हे दाखल केले असून संघटित बालतस्करी रॅकेट्सची भीती लक्षात घेऊन शोधमोहीम तीव्र केली आहे. पालक आणि संरक्षकांनी दिलेल्या तक्रारींवर आधारित अपहरणाचा संशय व्यक्त करून एफआयआर दाखल करण्यात आले आहेत.
ओशिवरामधून १४ वर्षीय शालेय मुलगा वर्गाला गेला पण परत आला नाही. असं त्याच्या ४६ वर्षीय वडिलांनी सांगितले. तर अँटॉप हिलमधून १२ वर्षीय मुलगा बागेत खेळायला गेला आणि परत आला नाही असं त्याच्या ३२ वर्षीय आईने सांगितले.
मानखुर्दमध्ये १५ वर्षीय मुलगा शेजाऱ्याला भेटायला गेला पण परत आला नाही, असं त्याच्या ५० वर्षीय वडिलांनी सांगितलंय. तर बांगुर नगरमध्ये १७ वर्षीय मुलगी वेफर्स आणायला बाहेर गेली पण परत आली नाही.
अँटॉप हिलमध्येही १५ वर्षीय मुलगी कामानिमित्त बाहेर गेली आणि बेपत्ता झाल्याची माहिती आहे. तर घाटकोपरमधून १७ वर्षीय मुलगी ट्यूशनसाठी घराबाहेर गेली पण परत आली नाही.
शिवाजी नगरमधून ४ मुलं बेपत्ता असल्याची माहिती आहे. यामध्ये १२ वर्षीय मुलगा घरातू निघून गेला आणि बेपत्ता झाला. तर १७ वर्षीय मुलगा घरात वाद झाल्यानंतर बाहेर गेला आणि परत आला नाही. याशिवाय १७ वर्षीय मुलगी आई घराबाहेर असताना बेपत्ता झाली आणि अजून एक ८ वर्षीय मुलगा खेळायला गेला परत आला नाही.
साकीनाक्याला २ मुलं बेपत्ता असल्याची माहिती आहे. यामध्ये १४ वर्षीय मुलगी वडील घराबाहेर गेल्यानंतर ती बेपत्ता झाल्याची माहिती आहे. याशिवाय एक १६ वर्षीय मुलगी फोटोकॉपी काढण्यासाठी बाहेर गेली पण परत आली नाही.
दरम्यान याबाबत मुंबई पोलिसांनी हे वृत्त फेटाळलं आहे. हरवलेली आणि अपहृत झालेली मुले याबाबतची आकडेवारी ही सोशल मीडियावरील अफवा आहे. काही हँडल्सकडून आकडेवारीची चुकीची मांडणी करण्यात आली आहे, असं मुंबई पोलिसांनी सांगितलं. खोटी माहिती पसरवणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असंही सांगण्यात आलं.